यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे.
प्रामुख्याने पृथ्वी,आप, तेज,वायु, आकाश या पाच महाभूतांचे विविध प्रमाणात एकत्रीत येण्यानेच आकार रूप, स्पर्शजन्य भौतिक वस्तु निर्माण झाल्या आहेत. त्यांचा समतोल बिघडला की ऑक्सीजन कमी होणे जास्त कार्बन निर्माण होणे, ओझोन नष्ट होणे आदी गोष्टी घडत असतात त्यामुळे पुनः पंचमहाभूतातूनच परत सर्व समतोल साधता येईल हे निश्चित असल्याने यज्ञाद्वारे म्हणजे अग्नि द्वारे आणि आकाश तत्व असलेल्या शब्दब्रह्म म्हणजे मंत्राद्वारे निसर्गाचे संतुलन पुनः साधता येईल. परंतू सर्व सामान्यांना हे कळत नसल्याने आणि सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो असे म्हटल्यास शुद्ध भावनेने ते केले जाते. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते, निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यु ह्या प्रवासात त्या समाविष्ट केलेल्या आहेत व त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत वा आयुष्यहोम हा यज्ञ वा होम मुलाच्या जन्मापासून ते पुढील आयुष्यप्रवास निरोगी व्हावा ह्याकरता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, दीर्घायुष्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जाहोम, घरासाठी वास्तूशांत, विविध प्रकारच्या शांती इ. करण्यास सांगितले आहेत.
पण हे झाले छोटे यज्ञ. समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रुद्रयाग, पर्यावरणासाठी सोमयाग, पर्जन्ययाग ह्यासाठी प्रसंगारूप मोठे यज्ञ केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱ्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे (अश्वथ्य (पिंपळ)) घर्षण करून अग्नीप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, सालीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार इ. वृक्षांच्या खाली पडलेल्या कांड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास ३ ते ४ तासाचा अवधी व मोठा यज्ञपूर्ण करण्यास ३ ते ७ दिवस अवधी लागतो.आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता ‘अग्निहोत्र’ ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधले. सर्व यज्ञात जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. ह्या सर्व यज्ञात मनःशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश “अग्निहोत्र’ने सुद्धा लाभू शकतात हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिध्द करण्याचे काम आम्ही गेले ५-६ वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यापर्यंत देण्यासाठी हा लेखनप्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.
“अग्निहोत्र’ हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी १० मिनिटात करता येतो.ह्या यज्ञाला जास्तीत जास्त रु.४ -५ इतका खर्च येतो.अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळाउपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.
अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.
१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र.
२. गाईच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे
३. गो वंशाच्या शेण्या (साधारणतः२)
४. दोन चिमूट अखंड तांदूळ (निवडलेले व बोरीक पावडर न लावलेले)
५. स्थनिक सूर्योदय व सुर्यास्त वेळा पत्रक
६. दोन सोपे मंत्र
सूर्योदयाच्या अग्निहोत्राचे वेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात.
सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम् न मम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम ||
सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम् न मम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्निसमोर बसणे.
अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ. अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले.
अग्निहोत्र प्रयोगाची खालील उदिष्ट्ये ठरवण्यात आली…
१. अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल
२. अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम
३. अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम
४. अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या / बी, बियाण वाढीवर होणारा परिणाम
५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म
६.अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण.
हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली व त्यासाठी प्रज्ञा विकास मंचाच्या ‘फ्रॉस्ट’ ह्या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्स मीटरच्या साह्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ 90% सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले.रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात होते हे आढळून आले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.अवघ्या रु. ३/- ते ५/- खर्चात रोज फक्त १० मिनिटे सकाळी वा संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतू विरहीत करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो- हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून, जागतिक वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध करू शकलो व जगात आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ह्यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी “मिनरल वॉटर” इतकं शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता सर्वानीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी नबाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
ह्या अभ्यासा दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, पोलंड, झेकस्कलोकोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्विझर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Home Farming Technique असे नावही दिले आहे.दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातूशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली आपला झोपी गेलेल्या, गुलामगिरी मानसिकतेच्या शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत.परवाच महालक्ष्मी मूर्तीवरती मूर्ती संवर्धनासाठी कोल्हापूरी लेप चढवण्यात आला. तो लेप आपल्या पूर्वजांनी ‘वज्रलेप’ म्हणून २००० वर्षापूर्वी तयार केला होता- तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. नुकतेच ह्याच महिन्यात इंग्लंडस्थित ‘पॅनगयिया’ ह्या कंपनीने आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या करताआपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला. आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण ‘कथिलाचा वाळा’ हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.
डॉ. प्रमोद प्र. मोघे ( निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ, NCL)